
मुंबई : वरळी हा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांचा मतदारसंघ आहे. आता भाजपाने आपली ताकद वरळीमध्ये निर्माण करायला सुरूवात केलेली आहे. भाजपा आमदार आणि मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झालेले आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी बुधवारी आदित्य ठाकरेंना आव्हान केलं असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे.
आशिष शेलार यांनी आज एक ट्विट केलेले आहे. याच्या माध्यमातून शिवसेनेला त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. विधानभवनाबाहेर ते बुधवारी बोलत होते यावेळी देखील त्यांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला होता. “मुळातच गड कुणाचा आणि कुणी ठरवला? आणि गडावर ठरणं आणि ठरवणं हे शेलारमामांशिवाय कोण करू शकतं? त्यामुळे गड वगैरे आम्ही मानत नाही. स्वत: आदित्य ठाकरे हेदेखील भाजपाच्या मतांवर निवडून आले आहेत. युतीमध्ये ते जिंकून आले आहेत”, असे ते म्हणाले होते.
आज केलेल्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी “भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे…आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय..भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत…लवकरच मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत ‘करुन दाखवतील’. आमचं ठरलंय!!” अस लिहिलेले आहे.
याचसोबत पुढे “ज्या वरळीत सेनेच्या खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे पक्षाला द्यायच्या १०० रूपयांच्या शपथपत्राला ‘बळ’ अपुरं पडतंय…दुसरीकडे भाजपाची जांबोरी मैदानातील दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय”, असे देखील ते ट्विटद्वारे म्हणालेले आहेत.