मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार पडल्यानंतर आणि शिवसेना कोसळल्यानंतर पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जनतेशी संपर्क साधून पक्षाची गमावलेली राजकीय विश्वासार्हता पुन्हा निर्माण करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) राज्यातील विविध भागात भेटी देत आहेत. ज्या विधानसभा मतदारसंघात आमदारांनी पक्षाविरोधात बंड केले आहे, त्या मतदारसंघांना ते भेट देत आहेत.
गेल्या दीड महिन्यांपासून शांत असलेले आदित्य ठाकरे आता ‘निष्ठा यात्रा’ आणि ‘शिवसंवाद’ कार्यक्रमांतून ते कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत आहेत. दरम्यान यावर असोसिएट प्रोफेसर केतन भोसले म्हणाले की, पक्ष वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांचे प्रयत्न खूपच कमी आणि खूप उशिरा झाले. “आधीच अनेक छिद्रे असलेल्या जहाजाला वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवसेनेने जो आक्रमक पवित्रा आणला होता तो आता चालणार नाही”.
विशेष म्हणजे, जूनमध्ये शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड केले, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार कोसळले. पक्षाच्या 18 लोकसभा खासदारांपैकी 12 खासदारांनी नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाशी हातमिळवणी केली आहे.