
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात होऊन त्यांचं निधन झाले आहे. मेटेंच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वचजण धक्कामध्ये आहेत. अनेक राजकीय व्यक्ती त्यांच्या जाण्याची हळहळ व्यक्त करत आहेत. यामध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मेटेंच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.
विनायक मेटे माझे खूप जवळचे मित्र होते त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख होत आहे. महाराष्ट्राच्या विकास कामांमध्ये आम्ही नेहमी सोबतच भाग घेतला आहे. त्यांचे अपघाती निधन हे महाराष्ट्रचं खूप मोठे नुकसान आहे. मी एक चांगला मित्र गमावला असल्याची भावना गडकरींनी व्यक्त केली आहे.
रस्त्यावर गाडी चालवताना अनेकांचे अपघात होतात त्यामध्ये अनेक लोक जीवाला मुकतात. त्यामुळे भारतीय नागरिकांनी आता संवेदशील बनायला हवं. विनायक मेटे यांचा अपघात कसा झाला याच ठोस कारण आजून मला माहित नाही, पण संपूर्ण देशाला अपघात मुक्त करणे हीच विनायक मेटेंना वाहलेली खरी श्रद्धांजली असेल, असे म्हणत गडकरींनी दुःख व्यक्त केले आहे.
नेमका कसा झाला अपघात?
विनायक मेटेंचा सहकारी एकनाथ कदम (Eknath Kadam) यांनी माध्यमांशी बोलताना अपघात कसा झाला याची माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही बीडवरून मुंबईला येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. त्यामुळे ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”