मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला व एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यांनतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमधला वादविवाद चालूचं आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली. आता तर भाजपाने उद्धव ठाकरेंना थेट विधिमंडळात येण्याचं आव्हान दिलं आहे.
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमधून उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घ्या, प्रश्नांना वाचा फोडा; उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना…उध्दव जी,आपणही राजीनाम्याची घोषणा करून राजीनामा न दिलेले विधान परिषदेतील आमदार आहात. मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? या विधिमंडळात आणि फोडा वाचा”.
दरम्यान माध्यमांशी बोलताना अतुल भातखळकर म्हणाले, “गेल्या वेळी आमच्याशी लढले, तेव्हाच यांच्या नाकातोंडात पाणी गेले होते. देवेंद्र फडणवीसांनी हिंदुत्वासाठी यांचा महापौर बसू दिला. आता तर भाजपा ११० टक्के मुंबई महानगर पालिका जिंकणार आहे. कारण तुम्ही भ्रष्टाचाराच्या पैशांनी मातोश्री भरली आहे. जनता त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही”