
Rajesh Tope । माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज शनिवारी घडली असून पाच ते सहा जण दुचाकीवरून आले आणि हल्लेखोरांनी लाठ्या आणि दगडफेक केली त्याचबरोबर काळ फासण्याचा देखील प्रयत्न केला. आता या घटनेनंतर राजेश टोपे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
याबाबत ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना राजेश टोपे यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. “लोणीकरांच्या समर्थकांनी माझ्या कारवर दगडफेक केली आहे. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही गोष्ट अत्यंत निषेधार्य आहे.” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक आणि उपसंचालकपदाची निवड होती. ही निवड बिनविरोध झाली होती. मात्र अज्ञातांनी राजेश टोपे यांच्या कारवर हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी कारमध्ये राजेश टोपे यांचा चालक होता. राजेश टोपे हे निवडणूक प्रक्रियेसाठी बँकेत गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यादरम्यान कारवर शाई, दगड फेकण्यात आले.