
सध्या कांद्याला भाव नसल्याने कांदा (Onion) उत्पादक शेतकरी (farmers) चांगलाच अडचणीत सापडला आहे. शेतकरी अक्षरशः कांद्याच्या पिकामध्ये रोटर फिरवत आहेत. ही परिस्थिती केवळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीच नाही तर इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांची देखील आहे. कोबी, फ्लावर तसेच लाखोंचा खर्च करून लावलेली केळीची बाग या पिकांमधून उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी थेट रोटर फिरवून पीक नष्ट करत आहेत. भाव न मिळणाऱ्या पिकावर रोटर फिरवण्यासाठी प्रति एकर किमान 2 हजार रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी युवा शेतकऱ्याने थेट राष्ट्रपतींनाच पत्राद्वारे मागणी केली आहे. शुभम गुलाबराव वाघ असं या युवा शेतकऱ्याचं नाव आहे.
बँकेतील कामे लवकर आटपा! मार्च महिन्यात तब्बल १२ दिवस बंद राहणार बँका, पाहा तारखा
पाहा नेमकं काय म्हंटल आहे पत्रात?
शुभम गुलाबराव वाघ राजमाता जिजाऊ नगर,
नवीन हाथ स्टैंड समोर, जामखेड 413201 ता- जामखेड, जि. अहमदनगर दि-09 मार्च 2023
प्रति,
माननीय राष्ट्रपती महोदया, भारत सरकार श्रीमती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती भवन
नवी दिल्ली
विषय :- कांदा व इतर पिकांना भाव न मिळणाच्या पिकांवर रोटर फिरवण्यास अनुदान मिळणेबाबत.
महोदया,
आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे, त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला काही दर मिळत नसल्याने उभ्या पिकांत रोटर फिरवावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजारात चेष्टा केल्याप्रमाणे 500 ने 1600 किलो कांदा विकून फक्त दोन रूपयांची पट्टी हातात मिळतेय. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कोबी, फ्लॉवर, कांदा आणि मोठा खर्च करून केलेली केळीच्या बागेतही रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
एकीकडे महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. पण खर्चाच्या निम्म्या रक्कमे इतकाही नफा शेतक-यांना मिळत नाहीये. तसेच शेतमाल निर्यात होत नसल्याने बाजारात आवक वाढतेय, त्यामुळे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला कवडीचाही दर मिळत नाहीये. आता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय.
कोणत्याही पीकाचं उत्पन्न घेतलं तरी हीच अवस्था होतेय. म्हणून माय-बाप सरकार तुम्हीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शेतात साधा रोटरफिरवायचा म्हटलं तरी, हेक्टरी 5000 ते 7000 रूपये लागतात. जिथे मोठया आशेने लावलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्या पिकात आज शेतकरी रोटर फिरवत आहे. जिथं शेतमालच विकला नाही, तर तिथे शेतकऱ्याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागतेय. शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही. पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का ?
आज शेतकऱ्यांना २ रुपये एवढी कांदयाची पट्टी मिळतेच, पण तोच कांदा सामान्यांना बाजागत २० रुपये किलो दराने मिळतो. मग शेतकऱ्यांची कोंडी आणि कोणाची चांदी होतेय? शेतकरी राजाने फक्त काबाड कष्टच करायचं का? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण आज या पोशिंदयावरच उपासमारीची वेळ आली आहे. आधीच लेकरांच्या तोंडाचा घास घेऊन उसनवारी करून पीक जोमात आणले, पण आता त्यालाच कवडीचा दर मिळतोय. म्हणूनच निदान भाव नसलेल्या पिकात रोटर फिरवण्यासाठी जगाच्या पोशिंद्याला किमान प्रति एकर 2 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, ही कळकळीची विनंती आहे.
आपला विश्वासू
शुभम गुलाबराव वाघ