मुंबई : खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना ईडीकडून पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढविलेली आहे. ईडीकडून आज संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेले आहे. भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर संजय राऊत यांचे भाऊ म्हणजेच सुनील राऊत (Sunil Raut) यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत.
सुनील राऊत म्हणालेले आहेत की, ”आज जी ईडीची कारवाई सुरू आहे, ती फक्त विरोधीपक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. किरीट सोमैया आणि मोहित कंबोज सारखी अमराठी माणसं सांगतात की विरोधीपक्षातील नेते भ्रष्ट आहेत. मात्र, स्वत: ते भ्रष्ट आहेत. हिंमत असेल तर भाजपाने पत्राचाळ घोटाळ्यातील नऊ कंत्राटदारांची चौकशी करावी, पण भाजपा अशी मागणी करणार नाही, कारण यात मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांचादेखील समावेश आहे. मात्र, ते भाजपाचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. ५० लाखांच्या खोट्या एंट्री दाखवून दबाव टाकून संजय राऊत यांना अटकवण्यात येत आहे”.
याचसोबत ”वर्षा राऊत यांना दोन दिवसांपूर्वी ईडीचे समन्स आले होते. त्यानुसार त्या आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेल्या आहेत. या प्रकरणात जे सत्य आहे, ते सर्वांसमोर येईलच. मात्र, हि सर्व कारवाई कोणाच्यातरी दबावाखाली सुरू आहे. आम्ही जी जमीन विकत घेतली आहे, ती रेडी रेकनर प्रमाणेच विकत घेतली आहे. त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा रोखीचा व्यवहार झाला नाही” अस देखील सुनील राऊत यावेळी म्हणालेले आहेत.
दरम्यान, या सर्व कंत्राटदारांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे.