निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर मिळालेल्या धक्क्यातून सावरत उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पक्षबांधणीच्या कामाला लागले आहेत. अलीकडेच त्यांनी वंचित आघाडीसोबत युती केली. दरम्यान काल (दि.25) आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal) व पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान यांनी उद्धव ठाकरेंची ( Uddhav Thackeray) भेट घेतली आहे. ‘मातोश्री’वर ही बैठक पार पडली.
या भेटीनंतर महाराष्ट्राच्या ( Maharashtra) राजकारणात नवीन चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे गट व आम आदमी पार्टी यांची युती होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे व अरविंद केजरीवाल यांनी सूचक वक्तव्ये देखील केली आहेत. केजरीवाल यांच्या भेटीबद्दल विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले की, अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
अगामी काळात आम आदमी पार्टी आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवतील का ? असे विचारण्यात येताच अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत की, ” 24 तास निवडणुकांबाबत विचार करणारा देशात फक्त एकच पक्ष आहे. आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार करत नाही. आम्ही फक्त देशाचा विचार करतो. आमच्यासमोर देश आहे. आमच्या समोर देशातील बेरोजगार युवक, शेतकरी, गृहिणी व महागाई आहे. भेटीत अशा मुद्द्यांवर आमच्यात चर्चा झाली. मात्र जेव्हा निवडणूक येईल तेव्हा निवडणुकीवर देखील चर्चा करू. “