
Anil Parab । पंढरपूर : आधी शिवसेना (Shivsena) मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पडल्याने राजकीय वर्तुळात खूप मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारपासून शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु होणार असून संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमागे भाजपचा (BJP) हात असल्याचा आरोप सतत विरोधांकडून केला जात आहे. (Politics News)
अशातच आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पक्षफुटीबाबत एक मोठा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांसकट 16 आमदार अपात्र ठरणार असून सत्ता सरकार वाचवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आहे. हे सरकार फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे,” असा गंभीर आरोप अनिल परब यांनी पंढरपूरमध्ये केला आहे.
तसेच त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केले आहे. “सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार नसून त्यासाठी योग्य इम्परिकल डाटा मागास आयोगाने द्यावा. मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला वंशावळ न पाहता सरसकट कुणबी दाखले मिळावे,” अशी मागणी परब यांनी केली आहे.