मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशन होणार आहे. विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. ‘५० खोके, गद्दार हाय हाय’ अशा घोषणा करत विरोधकांनी आमदारांना लक्ष्य केलं. यावर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सरकार लवकर कोसळणार असल्याचा दावा केला आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना आदित्य ठाकरेंचा देखील समावेश होता. यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्याविरोधात आम्ही उभे असून, हे गद्दार सरकार असून कोसळणारच,” असा दावा त्यांनी केला. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार असून नक्की कोसळणार असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
“याआधी राजकारणामध्ये गुंडगिरीची भाषा वापरली जात नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छित आहेत, तिथे ही भाषा मान्य आहे का?,” असा सवाल यावेळी आदित्य ठाकरेंनी केलाय. “ खऱ्या मुख्यमंत्र्यांचा अंकुश राहिला नसल्यानेच गुंडगिरीची भाषा वापरली जात आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.