निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. काल (दि.17) झालेल्या या निर्णयाने मागील साठ वर्षांचे ठाकरे व शिवसेना हे समीकरण संपुष्टात आले आहे. यामुळे ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज तातडीने पक्षाची बैठक बोलावली. आज (दि.18) मातोश्रीवर ही बैठक होत आहे. या बैठकीला ठाकरे गटातील सर्व आमदार, खासदार व नेते उपस्थित राहिले आहेत.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या गेटवर ओपन जीपमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक खुलं आव्हान दिल आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मर्द असाल तर चोरलेला धनुष्यबाण निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरा. मी देखील मशाल घेऊन येतो. मग बघू कोण जिंकत”. असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिल आहे.
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, निवडणूक आयोग हे मोदींचे गुलाम आहे. त्यामुळे आपण खचून जायचं नाही. मी देखील खचलेलो नाही. महाराष्ट्रामध्ये पुन्हा भगवा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.