मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषणात एक वक्तव्य केले. दीड महिन्यापूर्वी आम्हीपण ५० थरांची हंडी फोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांचे हे वक्तव्य आता खूप चर्चेचा विषय बनले आहे. या कार्यक्रमाला अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) देखील उपस्थित होती.
एकनाथ शिंदे दहीहंडी उत्सवामध्ये भाषण करताना म्हणाले की, “धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जात आहे. मुंबईतील प्रत्येक गोविंदा टेंभी नाक्याला सलामी देऊन पुढे जातोय. हा आपला इतिहास आणि परंपरा असून ही परंपरा वाढवण्याचं आणि टिकवून ठेवण्याचे काम आपले आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. त्यांच्या पुण्याईमुळे आणि आशीर्वादामुळे मला मुख्यमंत्री म्हणून या दहीहंडीला उपस्थित राहता आलं, हे मी माझं भाग्य समजतो.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील सर्वात मोठी हंडी फोडली आहे. ती हंडी फोडणं खूप अवघड काम होत. पण आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही ती हंडी फोडू शकलो. आम्ही ५० थर लावले होते. हे थर आणखी वाढत जातील, याची काळजी करायचं कोणतंही कारण नाही”.