
मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेतकरी पुत्राच्या कंपनीने फोर्ब्स’च्या यादीतील उद्योजकता क्रमवारीत १०० गुणवंत कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. ग्रामहीत असे या कंपनीचे नाव आहे. शेतमालाच्या बाजारपेठेतील उतार चढावात शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देणारी ही कंपनी फोर्ब्स द्वारे आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत निवडली गेली आहे. फोर्ब्स हे अमेरिकन व्यावसायिक मासिक असून ते जगातील गुंतागुंतीच्या समस्या नावीन्यपूर्ण रीतीने सोडविण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवा पुरवणाऱ्या संस्थांची दखल घेत असते. त्या कंपनीची कामगिरी जगासमोर मांडून नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देत असते. ‘फोर्ब्स’ यादीत निवड व्हावी म्हणूनयंदा ६५० कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. यात ग्रामहितचाही समावेश होता. ही कंपनी शेतकऱ्यांना शेतात साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत उपलब्ध करून देते.
फोर्ब्स’ हे मासिक वर्षातून केवळ आठ वेळा प्रकाशित होते. यात वित्त,उद्योग, गुंतवणूक आणि विपणन या विषयावरील लेख प्रसिद्ध होतात. ‘फोर्ब्स’ तंत्रज्ञान, संप्रेशन,विज्ञान, राजकारण आणि कायदा यासारख्या संबंधित विषयावरही अहवाल देते. त्यामुळे ‘फोर्ब्स’ च्या यादीत “ग्रामहित” ला स्थान मिळणे हे पंकज महल्ले व श्वेता ठाकरे यांच्या कर्तृत्वाचे हे फळ आहे. शेतमालाच्या बाजारपेठेतील चढउतारात शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देण्याकरिता त्यांची ‘ग्रामहीत’ ही संस्था शेतकऱ्यांसाठी उभी केली आहे. सध्या ही संस्था शेतकरी हिताच्या दिशेने कार्यरत आहे.
काय कार्य करते ग्रामहित कंपनी ?
पीक काढणी हंगामात एकाच वेळी बहुतेक शेतकरी आपला माल विविध कारणांनी विक्रीला आणतात. स्वाभाविक व्यापारी वर्ग शेतमालाचे भाव पाडतो. देणेकरांच्या दबावामुळे व उसनवार फेडण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात माल विकून मोकळे होतात. यासाठी ग्रामहीत’ कंपनीने काही उपाय सुचवले आहे. त्यात माल साठवणुकीची उत्तम शास्त्रीय व्यवस्था तसेच साठवलेला शेतमाल तारण ठेवून सुलभ व कमी व्याजदरात कर्जाची उपलब्धता,पुढेही शेतकऱ्याला माल विकायचा झाल्यास घरूनच मोबाईल क्लिकवर विक्री व्यवहार पूर्ण करताना तारण कर्ज परस्पर वळते करून घेतले जाते. वारंवार बाजारपेठात जाण्याची शेतकऱ्यांना गरज पडत नाही. अशा बाबी गावातच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाल्यास ते सोयीचे ठरते. त्यामुळे ‘ग्रामहिता’ने अशीच व्यवस्था यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतकरी कुटुंबांना मिळवून दिली. त्यांनी या पद्धतीचा लाभही उचलला आहे. त्यामुळेच ‘फोर्सचे’ ग्रामहित या संस्थेची निवडलेल्या १०० कंपन्यांमध्ये निवड केली आहे.